Advertisement
चाकण : आजचे स्पर्धेचे युग पाहता स्वत:सह कुटुंबाच्या सर्वांगिन प्रगतीसाठी महिलांनी घराचा उंबरठा ओलांडायला हवा, असे प्रतिपादन बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले.
मुढकेवाडी (चाकण) येथे रिपब्लिकन पाटी ऑफ इंडिया (आठवले गट) व्यापारी आघाडी यांच्या संयोजनानुसार सावली फाउंडेशन, बहुजन रयत परिषद, तसेच सौ. अर्चनाताई प्रविण गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण, सन्मान समारंभासह हळदी-कुंकु कार्यक्रमात उपस्थित भगिनींना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन आरपीआयचे प्रदेश सचिव सचिन वाघमारे यांनी केले होते.
अॅड. कोमलताई म्हणाल्या की, महिलांनी आत्मसन्मानाने राहायला हवे यासाठी स्वत:मधील क्षमता ओळखणे गरजेचे आहे. एक महिला आपले कुटुंब चालविताना अतिशय सक्षमपणे जाबाबदारी पार पाडते, तेच गुण उद्योग, व्यावसायात वापरले तर आर्थिक प्रगती निश्चीत आहे. आज, महिला बचतगट निर्माण झाले आहेत. या माध्यमातून महिलांना चांगले व्यासपिठ मिळत आहे. बचतगटांच्या माध्यमातूनच अनेक उद्योजिका घडल्या आहेत. भिमथडी, पवनाथडी अशा मोठ्या जत्रांच्या माध्यमातून बचतगटांना संधी दिली जात आहे. आपल्या भागातूनही अशा उद्योजिका घडणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा व्यक्त करीत अॅड. कोमलताई यांनी सदर समारंभामुळे महिलांना एकत्र येण्यासाठी हक्काचे व्यासपिठ मिळाले, याबद्दल आयोजकांचे आभार मानले.
यावेळी आदर्श माता कै.गं.भा.हौसाबाई बंडू आठवले पुरस्काराने सौ. विजयाताई जाधव, आदर्श माता कै.गं.भा.गिरजाबाई कोंडिंबा ढोबळे पुरस्काराने सौ. आशाताई आरगडे तसेच आदर्श माता कै.गं.भा.धोंडाबाई मारूती घनवट पुरस्काराने सौ. अलका आत्माराम जोगदंड यांना सन्मानित करण्यात आले. तसेच, कै. सुरेशभाऊ गोरे युवा रत्न आदर्श समाज सुधारक पुरस्कार हा अमोल साळवे, धीरज सुटके, किशोर अहिरे, नरेंद्र वाळुंज, सुर्यकांत बारणे, बाबासाहेब हजारे, अशोक कदम यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण सीमाताई आठवले, अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे, पोपटशेठ घनवट, सुर्यकांत वाघमारे, नितीन गोरे, चंद्रकांताताई सोनकांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
भगिनींनो गर्दी करू नका, अर्ज व्यवस्थित भरा...
अॅड. कोमलताई यांचे आगमन व्यासपिठावर झाले त्यावेळी कार्यक्रमस्थळी उपस्थिती महिलांचे पोस्टाच्या अपघाती विमा अर्ज भरण्याचे काम सुरू होते. त्या ठिक़ाणी महिलांनी मोठी गर्दी केली होती. हे पाहून अॅड. कोमलताई यांनी माईक हाती घेत.., भगिनींनो तेथे गर्दी करू नका, 10 लाखाचा अपघातील विमा अर्ज आहे, तो भरून देताना चूक झाली तर त्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही, त्यामुळे गर्दी न करता व्यवस्थित अर्ज भरून द्या, असे आवाहन केले. त्यावेळी उपस्थित महिलांनीही त्यांना प्रतिसाद देत गर्दी कमी केली.
