Advertisement
अमरावती : उद्धव ठाकरे घाबरले असल्याने त्यांनी अमरावतीत उमेदवार दिला नाही असा टोला नवनीत राणा यांनी लगावला आहे. हनुमान चालिसा म्हणते असं म्हटल्याने मला 14 दिवस जेलमध्ये टाकलं होतं. आपल्यापेक्ष लहान लोकांना जेलमधये टाकून तुम्ही मोठे होत नाही अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. तसंच अमरावतीमध्ये येणारं टेक्सटाइल पार्क रोखल्याचा गंभीर आरोपही केली. त्या अमरावतीत आयोजित प्रचारसभेत बोलत होत्या. यावेळी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेही मंचावर उपस्थित होते.
बरोबरीच्या व्यक्तीशी लढून दाखवा. माझा सोन्याचा चमचा घेऊन जन्म झाला नाही. स्वतःचं ताट स्वतः तयार केले आहे. उद्धव ठाकरे माझ्याविरोधात आज उमेदवार उभा करायला घाबरत आहेत. अमरावती पाहिजे असं बोललेही नाही. उद्धव ठाकरे घाबरले असून, दुसऱ्या पक्षाला उमेदवारी दिली, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. अमरावतीकर माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत. मी कधीच मर्यादा सोडून बोललेली नाही आणि ती संस्कृतीही नाही. माझ्या बापाचं नाव काढतात. माझ्या वडिलांनी सीमेवर देशासाठी योगदान दिलं. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर माझे खरे बाप आहेत. त्यांचे विचार घेऊन मैदानात उतरत आहे. माझा बाप काढणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी महिला, शेतकरी, शेतमजूर पुढे येतील, असाही निर्धार त्यांनी व्यक्त केला.
