Advertisement
मुंबई : निवडणुकीत पैसेवाटप झाल्यासंबंधीही शरद पवारांनी गंभीर आरोप केले आहेत. या निवडणुकीत सत्ताधा-यांकडून कधी नव्हे इतका पैसा महाराष्ट्रामध्ये वाटला. बारामतीत मध्यरात्रीपर्यंत बँक उघडी होती. असं कधी ऐकलं नव्हतं अशी टीका शरद पवारांनी केली आहे. 'झी २४तास' या खासगी वहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी हे आरोप केले.
शरद पवार म्हणाले की, या सर्व भागांमध्ये आम्हाला यश मिळेल. या निवडणुकीत मी पहिल्यांदाच कधी नव्हे इतका पैसा वाटल्याचं पाहिलं. पैशाचं वाटप अशी गोष्ट आम्ही आधी ऐकली नव्हती. बारामती लोकसभा मतदारसंघात रात्री 2 वाजता बँक उघडी आहे आणि त्यात 30 ते 40 लोक असून पैशांचे व्यवहार सुरु होते. अखेर पोलिसांना कारवाई करावी लागली. बँकेच्या मॅनेजरला अटक कऱण्यात आली. हे कधी ऐकलं होतं का?. महाराष्ट्रात असा प्रकार कधी पाहण्यात आला नव्हता. सरसकटपणे घरोघरी जाऊन पैसे वाटले जात असल्याचं कधी पाहिलं नव्हतं. सत्ताधाऱ्यांमध्ये आत्मविश्वास नसल्याने हे सर्व दिसत आहे. पैसे वाटण्याशिवाय पर्याय नाही असं त्यांना वाटत आहे असा आरोप शरद पवारांनी केला आहे.
