Advertisement
बहुजन रयत परिषद प्रदेशाध्यक्ष अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे याचे आवाहन
सोलापूर : लोकसभेसाठी मंगळवारी (ता.7) मतदान होत असताना सोलापुरात बहुजन रयत परिषदेची मत नेमकी कोणाला जाणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. बहुजन यत परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते जनतेच्या मनातील उमेदवारालाच मतदान करतील, मग तो कुठल्याही पक्षाचा का असेना. जनतेशी बांधिलकी जपणारा, जनतेसाठी लढणारा, जनतेचे प्रश्न सोडविणारा, ज्याने मतदार संघात मतदारांसोबत न्याय केला आहे आणि पुढेही करेल, अशा विश्वासू उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान झाले पाहिजे, यासाठी घराबाहेर पडा, मतदान करा, आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून मतदानाचा हक्क बजावा, असे आवाहन बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले आहे.
हैद्रा (ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) येथे बहुजन रयत परिषदेची राज्यस्तरीय बैठक झाली होती. यावेळी सोलापुर जिल्ह्यासह राज्यभरातील संघटनेचे कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचवेळी प्रदेशाध्यक्षा अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी बहुजन रयत परिषदेची भूमिका स्पष्ट केली होती. यापार्श्वभूमीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सोलापूर मतदार संघातील नागरिकांना मतदान करण्यासंदर्भात आवाहन केले. एका मताची ताकद खूप मोठी असते, हे एक आपले राष्ट्रीय कर्तव्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यावेळी बहुजन रयत परिषदबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, राज्यातील परिषदेची ताकद मोठी आहे, कोणत्या उमेदवाराला निवडायचं आणि कोणत्या उमेदवाराला पाडायचं, हे बहुजन रयत परिषद करु शकतो. याच कारणास्तव या निवडणुकीत बहुजन रयत परिषदेने कोणाच्याही पक्षाला अथवा उमेदवाराला पाठींबा दिलेला नाही. बहुजन रयत परिषद ही एक सामाजिक संघटना आहे. एक सामान्य कार्यकर्ता ते उत्कृष्ट नेतृत्व आमच्या परिषदेतून निर्माण झाले आहेत. त्यामुळेच परिषदेचे नेतृत्व करत असताना कोणतीही राजकीय भूमिका घेताना ती महत्त्वाची ठरते. लोकसभेत तरी आम्ही कुठल्या एका पक्षाला पाठिंबा दिलेला नाही.
