Advertisement
संभाजीनगर : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंचा तोल गेलेला आहे. त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज आहे. त्यांनी चांगल्या मानसोपचारतज्ज्ञांना दाखवावं, अशी जहरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
संभाजीनगर येथे आज देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांनी पिंपरी-चिंचडव येथील सभेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आले. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. 'उद्धव ठाकरेंचा तोल गेलाय आहे. त्यांना वैद्यकीय मदतीची गरज आहे. त्यांनी एखाद्या चांगल्या मानसोपचारतज्ज्ञांना दाखवावं. त्यांनी मदत घ्यावी, मला असं वाटतं,' असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.
फडणवीस पुढे म्हणाले की, ज्या स्तराला जाऊन एखाद्या पक्षाचा प्रमुख बोलतो. तेव्हा त्यांना हे लक्षात येतं की जनतेने त्यांना नाकारलं आहे आणि म्हणून ते शिवीगाळ करण्यावर उतरले आहेत. त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. त्यामुळं त्यांनी वैदयकीय मदत घ्यावी. अजित पवार उद्धव ठाकरेंना किती ओळखतात हे माहिती नाही. पण मी उद्धवजींना चांगलाच ओळखून आहे. सध्या त्यांचे फिलोसॉफर आणि गाइड पवार साहेब आहेत. पवार साहेब जे म्हणतील तेच उद्धव ठाकरे करतील, असंही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.
