Advertisement
मुंबई : अधिवेशन सुरु असतानाच एनडीएचं संख्याबळ 284 वरुन 300 च्या पुढे जाईल असा मोठा दावा अजित पवार यांनी केला आहे. तसंच 1 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत राज्यसभेत आपले 3 सदस्य असतील असंही म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापन दिन असून यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी हे विधान केलं आहे.
नरेंद्र मोदींनी मी सर्व घटकपक्षांनी वेळ देऊ शकत नसल्याचं सांगितलं होतं. त्यांनी स्वतंत्र कराभार आणि राज्यमंत्रीपद देण्याबाबत सांगितलं होतं. 1 जुलै किंवा 15 ऑगस्टपर्यंत राज्यसभेत आपले 3 सदस्य पाहायला मिळतील. आम्ही प्रफुल्ल पटेल यांचं नाव सुचवलं होतं. त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद हाताळलं असल्याने स्वतंत्र कारभार पाहणं आम्हाला पटत नसल्याचं सांगितलं. एकनाथ शिंदे यांनाही स्वतंत्र कारभार दिल्याचं ते म्हणाले. त्यावर आम्ही जर तुम्हाला जमत नसेल तर पद स्विकारणार नाही असं सांगितलं. आम्ही एनडीएच्या पाठीशीच राहू. पण त्याचा विपर्यास करत चुकीच्या बातम्या देण्यात आल्या, असा दावा अजित पवारांनी केला आहे.
पक्षाला अपेक्षित यश मिळालेलं नसलं तरी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड मतदारसंघात विजय मिळणं अभिमानाची बाब आहे. अरुणाचल प्रदेशातही आमदार निवडून आले ही चांगली बाब आहे. तटकरेंना तुम्ही पक्षाची लाज राखली असं म्हटलं. मी त्यांचं अभिनंदन कतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो," असं अजित पवार म्हणाले.
आपण महायुतीत असलो तरी शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही. हे मी मित्रपक्षांनाही स्पष्ट सांगितलं आहे. विरोधक चुकीच्या पद्दतीने नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात. चंद्र-सूर्य असेपर्यंत संविधान कोणी बदलू शकणार नाही असं मी सांगितलं होतं. पण आपण जे सांगत होतो ते मागासवर्गीयांनी समजावण्यात अपयशी ठरलो. पण विरोधक त्यात यशस्वी झाले, अशी सल अजित पवारांनी बोलून दाखवली.
