Advertisement
मुंबई : विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा अद्याप रिक्त आहेत. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात विधान परिषदेच्या 12 रिक्त जागा भरण्याबाबत तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहिले होते. त्यावेळी मंत्रिमंडळाने 12 आमदारांच्या नावाची शिफारस राज्यपाल कोश्यारी यांना केली होती. मात्र, त्यांनी ती फाईल मंजूर केली नाही. त्यामुळे त्यावेळी ती यादी तशीच पडून राहिली. मंत्रिमंडळाने दिलेली यादी त्यांनी मंजूर करणे आवश्यक होते. त्यामुळे तत्कालीन ठाकरे सरकारने कोर्टात धाव घेतली आहे. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार आले आणि राज्यपाल कोश्यारी यांच्या जागीही आता नवे राज्यपाल रमेश बैस आले आहेत. विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त आमदार कुणाला करावे याची यादी मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठरते. त्यामुळे महायुतीचे सरकार लवकरच 12 आमदारांच्या नावाची यादी राज्यपाल महोदयांना सादर करणार आहे. विधानसभा निवडणूक लागण्याआधीच त्याचा निर्णय घेऊ असे अजित पवार यांनी सांगितले. सध्या विधान परिषदेत एकही मुस्लिम आमदार नाही त्यामुळे त्या समाजाला संधी देऊ असेही ते म्हणाले.
