Advertisement
मुंबई : पक्ष सोडून गेलेले लोक परत येण्याबाबत मला कोण भेटलं नाही, पण जयंत पाटील यांना भेटले याची मला माहिती आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. आमचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे आहे. आम्ही स्थापन केलेला पक्ष आणि चिन्ह वेगळी भूमिका घेतलेल्या लोकांना दिला. हे सगळं प्रकरण कोर्टात आहे, पुढील आठवड्यात त्याची सुनावणी आहे, असेही स्पष्ट करून शरद पवार यांनी इतर मुद्द्यांवरही भाष्य केले.
राज्य सरकारने योजना जाहीर केल्या, पण माझा अनुभव आहे की, अंदाजपत्रक मांडल्यानंतर 6 महिन्यांनी पुरवणी मागण्या मांडल्या जातात. पण इथं केवळ 8 दिवसात पुरवणी मागण्या मांडल्या. शासनाकडे असलेला निधी आणि घोषित केलेल्या योजना यात खूप अंतर दिसतं, असं निरीक्षण शरद पवार यांनी नोंदवलं. मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय चांगला आहे. पण संपूर्ण राज्यात ही योजना पार पाडता येईल का? असा सवाल शरद पवार यांनी केला आहे.
