Advertisement
नाशिक : बांगलादेशातील अराजकाचा परिणाम नाशिकमधील कांदा निर्यातीवर झाला आहे. गेल्या 48 तासांपासून कांद्याचे ट्रक सीमेवर अडकून पडले आहेत. मंगळवारी मध्यरात्री कांदा बांगलादेशात जाणं अपेक्षित होतं. नाशिकहून बांगलादेशला जाणारे कांद्याचे रोजचे 80 ट्रक सीमेवर थांबले आहेत. जर कांद्याचे ट्रक तिथेच अडकून राहिले तर ते खराब होतील. यामुळे व्यापाऱ्यांना करोडोंचं नुकसान होऊ शकतं. बांगलादेशात हिंसाचार उफाळला असून सर्वसामान्य जीवन विस्कळीत झालं आहे. घरं, कार्यालयं पेटवली जात असताना सध्या बांगलादेशात जाणं संकटात जाण्यासारखं आहे. केंद्र सरकारही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पावलं उचलत आहे. याचमुळे बांगलादेशला निघालेले हे ट्रक सीमेवर थांबवण्यात आले आहेत. जवळपास 3 हजार टन कांदा या ट्रकमध्ये असल्याची माहिती आहे.
भारतातून दरवर्षी बांगलादेशात कांदा निर्यात केला जातो. 2023-24 मध्ये भारतातून होणाऱ्या एकूण कांदा निर्यातीपैकी 20.3 टक्के कांदा बांगलादेशात पाठवण्यात आला होता. भारताच्या प्रमुख आयातदारांपैकी बांगलादेश आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात सुरु असलेल्या अराजकतेचा परिणाम कांदा निर्यातीवर झाला आहे.
