Advertisement
पुणे : बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंदची घोषणा महाविकास आघाडीने केली आहे. यामागे कुठलीही राजकीय भूमिका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या बंदला बहुजन रयत परिषदेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला असून याबाबतच्या सूचना पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिल्या असल्याचे प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले.
या बंदमध्ये राजकारण नाही. हा विकृतीचा व्हायरस आहे. कोणीही असं कृत्य करण्याची हिंमत व्हायला नको. जर कोणी केली तर त्याला ताबडतोब कठोर शिक्षा होते ही भीती विकृतांच्या मनात निर्माण कऱण्यासाठी हा बंद महत्वाचा ठरणार असल्याने यामध्ये सर्वानी सहभागी व्हावे, असे आवाहन ही ऍड. कोमलताई यांनी केले आहे. बदलापूर येथील शाळेतील विद्यार्थिनींवर अत्याचाराच्या घटनेबाबत ऍड. कोमलताई यांनी गृहमंत्र्यांना निवेदन दिले आहे. ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले की, कायदा आणि सुव्यवस्था कितीही प्रगत असली तरी आपल्या फायद्यानुसार वळवण्याची विकृती थांबवणे गरजेचे आहे. घटना घडल्यानंतर तात्पूरता निषेध, आंदोलन, गदारोळ करणे थांबवून आरोपीला मिळणारी शिक्षा इतकी भयावह असली पाहिजे की त्या शिक्षेची दहशत अशा नराधमांमध्ये कायम घर करून राहिली पाहिजे. कारण आपण हेच करायला कमी पडतो; म्हणून आपल्या लेकीबाळी अशा घटनांना बळी पडत आहेत.
