Advertisement
मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारख्या जाहीर केल्या. त्यानुसार, महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुक मतदान होत असून 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यामुळे, राज्यात दिवाळीनंतर देखील पुन्हा एकदा दिवाळीसारखेच पण राजकीय फटाके फुटणार आहेत. गत 2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदा 1 महिना उशिराने निडणुका पार पडत आहेत. विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी केवळ 15 दिवसांत तयारी करावी लागणार आहे. कारण, 29 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख देण्यात आली आहे. तर, 4 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येईल. त्यामुळे, राजकीय पक्षांना लवकरात लवकर उमेदवारांची घोषणा करावी लागेल. त्यात, मनसे व वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेत अनुक्रमे 7 व 21 उमेदवार जाहीर केले आहेत.
राज्यातील 288 मतदारसंघात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून याच महिन्यात 22 ऑक्टोबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. तर, 29 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरावा लागणार आहे. म्हणजेच, 15 दिवसांतच उमेदवारांना अर्ज भरण्याची तयारी करावी लागेल. त्यामुळे, पुढील 4 ते 5 दिवसांत राजकीय पक्षांना आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा करावी लागणार आहे. मात्र, आत्तापर्यंत उमेदवारांची घोषणा करण्यात मनसे आणि वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतली आहे. राज ठाकारे यांनी मनसेच्या 7 उमेदवारांची आत्तापर्यंत अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली आहे. तर, प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील 21 मतदारसंघात वंचितच्या 21 उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.
