Advertisement
माजी मंत्री ढोबळेंवर भाजप सोडण्याचा समर्थकांचा दबाव
सोलापूर : भारतीय जनता पक्षाकडून माजी मंत्री तथा पक्ष प्रवक्ते प्रा. लक्ष्मण ढोबळे यांना सातत्याने डावलले जात असल्याने तसेच दुय्य्यम वागणूक दिली जात असल्याने, ढोबळे साहेबांनी भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पक्षातून बाहेर पडावे, असा दबाव बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर आणला जात आहे. ढोबळे यांनी भाजप सोडल्यास ऐन निवडणुकीवेळी भाजपसाठी हा खूप मोठा धक्का असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनही माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी शरद पवार यांना मोठी साथ दिली. मात्र, दहा वर्षांपूर्वी राष्ट्रवादीतील काहींच्या दादागिरीतला कंटाळून ढोबळे यांनी भाजपत प्रवेश केला होता.
भाजपने सुरवातीची काही वर्ष कुठलीही विशेष जबाबदारी दिली नव्हती, त्यानंतरही ढोबळे हे सातत्याने पक्षासाठी कार्यरत होते. येत्या काही काळात त्यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली गेली. मात्र, भाजपमध्ये त्यांना सातत्याने डावलले जात असल्याने तसेच, प्रमुख कार्यक्रमाला बोलावले जात नसल्याने, ढोबळे यांची भाजपमध्ये अवहेलना होत आहे, असा आरोप त्यांच्या नियंत्रणात असलेल्या बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला आहे . कडून केला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्यावर राजकीय हेतूने आरोप करून त्यांना राजकारणातून बाजूला करण्याचे प्रयत्न स्थानिक कनिष्ठ नेते मंडळींकडून सुरू आहेत, तरीही भाजपचे वरिष्ठ नेते गप्प आहेत, असे सांगून बहुजन रयत परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. 14 ऑक्टोबर) मंगळवेढा येथील ढोबळे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेत भाजपच्या प्रवक्तेपदासह सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करत बहुजन रयत परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ढोबळे यांच्यावर दबाव निर्माण केला. यावेळी ढोबळे यांनी निर्णयासाठी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात ढोबळेंचा शाहू परिवार मोठा आहे. याशिवाय त्यांच्या मागे समाजदेखील आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली मागणी महत्वपूर्ण ठरत आहे. याकडे भाजपचे नेतेमंडळीना दुर्लक्ष करून चालणार नाही.
यावेळी बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड कोमल ढोबळे, सोलापूरचे बंडू पवार), साताऱ्याचे सुरज मुजावर), अकोल्याचे सचिन ऐवळे, यवतमाळचे सचिन खडसे, गोंदियाचे उमेश धुंडे, वर्धाचे अजय डोंगरे, धाराशिवचे योगेश येडाळे, जालनाचे सुनील भालेराव, नांदेडचे साहेबराव गुंडले, परभणीचे अजय वाघमारे, लातूरचे श्यामभाऊ चव्हाण, नाशिकचे राजू थोरात, अहिल्यानगरचे बापूसाहेब गायकवाड), नंदुरबारचे गणेश साठे, बीडचे विनोद हातगडे, धाराशिवचे मीना धावारे यांसह प्रकाश खंदारे, संभाजी हेगडे आदींसह बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते
भाजपने विचार केला नाही तर वेगळा निर्णय : ऍड. कोमलताई ढोबळे
भाजपने प्रवक्तेपदाची जबाबदारी दिल्यानंतर पक्षाकडून कार्यक्रमाबाबत विचारणा किंबहुना विश्वासात घेतले जात नाही. पक्षाच्या कार्यक्रमातही डावलले जात आहे, त्यामुळे सध्या त्यांची पक्षाला गरज उरली नसावी ; म्हणून त्याना डावलले जाते आहे. लोकसभेच्या पाच राखीव जागेवर संधी देण्याची मागणी केली असता पक्षाने विचार केला नाही. विधानसभेच्या २९ जागा राखीव आहेत. अशावेळीही त्यांचा विचार केला जात नाही याचा अर्थ असाकी ढोबळे यांची राजकीय कारकीर्द संपवून टाकायची आहे. याच कारणातून वेळीच भाजप पक्षातून बाहेर पडावे असा दबाव पदाधिकारी यांनी टाकला आहे.
