Advertisement
औरंगजेबची कबर हटाव'वरुन राऊतांचा बजरंग दलाला टोला
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची कबर खणलेली आहे. ती कबर बघा आणि मग महाराष्ट्राच्या नादाला लागा हा इतिहास आहे. ज्याला इतिहासाचे भान नाही असे सगळे इतिहासाच्या बाबतीत रडत असलेली लोक आहेत. तेच हे करत आहेत. अफजलखानाचा कोथळा महाराजांनी काढला इतिहासाला ते पिढीला माहिती पाहिजे. ही सगळी काही लोक आणि उद्योग करतात इतिहास नष्ट करण्याचे काम सुरू आहे. ही थडगी असायला हवीत. हा आमचा इतिहास आहे. हा आमच्या शौर्याचा इतिहास आहे अशी भूमिका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मांडली आहे.
औरंगजेबची कबर हटवली जावी या मागणीसाठी राज्यभरातील अनेक ठिकाणी बजरंग दलाकडून आंदोलन केलं जात आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आज तिथीनुसार असलेल्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर 'औरंगजेबची कबर हटाव' असे बॅनर्स हातात धरुन आंदोलनं केल्याचं पाहयला मिळालं. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी आपलं परखड मत नोंदवताना सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात, देशात, राज्य कोणाचे आहे? त्यांचेच आहे. त्यांच्याच पक्षाचे राज्य आहे. मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे कोणाचे आहेत? या विचारांच्या लोकांचे आहेत. हिंसक हिंदुत्ववाचे आहेत. मग त्यांना अडवलं कोणी कबर हटवायला? शासनाने हटवावी ना कबर! मारामाऱ्या कशाला करता? नाटकं कशाला करता? लोकांना त्रास का देता? सांगा आरएसएसला फर्मान काढा म्हणून, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद ही भाजपची पिल्लं आहेत. मग हे सगळं वातावरण खराब करून लोकांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही शासकीय अध्यादेश काढा, हिंमत आहे का असा आदेश काढण्याची?" असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.
