Advertisement
दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या एक दिवसानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी बुधवारी दावा केला की, या घटनेशी त्यांचा काहीही संबंध नाही. या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले. तथापि, भारतीय अधिकाऱ्यांना मात्र पाकिस्तानच्या या दाव्यावर विश्वास नाही. सुरुवातीच्या तपासात नागरिकांवर गोळीबार करणाऱ्या अतिरेक्यांच्या गटात परदेशी असल्याचं समोर आलं आहे.
मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामजवळील एका टेकडीवर किमान 25 पर्यटक आणि एका खोऱ्यातील रहिवाशाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मुंबईवरील 26/11 च्या गोळीबारानंतर देशातील नागरिकांवर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. आमचं याच्याशी काही देणंघणं नाही. आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाला नकार देतो, असं आसिफ यांनी पहलगाम हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानच्या टीव्ही चॅनेलशी बोलताना सांगितलं.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे की, अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर आम्हीदेखील काळजीत आहोत. मृतांच्या जवळच्या नातेवाईकांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो आणि जखमी लवकर बरे व्हावेत अशी इच्छा व्यक्त करतो.
पाकिस्तानमधील बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेशी संबंधित गट असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटने (टीआरएफ) या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचं सांगण्यात येत असल्याने दिल्लीने इस्लामाबादच्या दाव्यावर शंका व्यक्त केली आहे. सुरक्षा यंत्रणेतील एका अधिकाऱ्याने सांगितलं की, पीडित आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवल्यानंतर प्राथमिक चौकशीत चार दहशतवादी ज्यात दोन परदेशी नागरिक असल्याचं मानले जात आहे.