Advertisement
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणावाचं वातावरण आहे. दोन्ही देशातील तणावाच्या पार्श्वभूमीचा देशातील इंधन पुरवठ्यावर काय परिणाम होणार याची चिंता अनेकांना सतावत होती. पण, काळजी करण्याचे कारण कोणतेही कारण नाही. देशात इंधन पुरवठा करणाऱ्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडनं (बीपीसीएल) याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
देशव्यापी नेटवर्कमध्ये पुरेसे पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजी साठा उपलब्ध असल्याची माहिती बीपीसीएलनं दिली आहे. आमच्या देशव्यापी नेटवर्कमधील सर्व बीपीसीएल इंधन केंद्रे आणि एलपीजी वितरक सुरळीतपणे कार्यरत आहेत आणि ग्राहकांच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहेत.
नागरिकांनी काळजी करण्याचे किंवा घाबरून तातडीने आवश्यक खरेदी करण्याचे कोणतेही कारण नाही. आमचे पुरवठा साखळी ऑपरेशन्स मजबूत आणि कार्यक्षम आहेत, ज्यामुळे अखंड पुरवठा सुरु आहे. बीपीसीएल ऊर्जा सुलभता आणि विश्वासार्हतेसाठी त्यांच्या वचनबद्धतेवर दृढ असून आम्ही सर्व ग्राहकांना शांत राहण्याचे आवाहन करतो, असं कंपनीनं सांगितलं आहे.
भारत पेट्रोलियम ही दुसरी सर्वात मोठी इंडियन ऑइल मार्केटिंग कंपनी आहे आणि भारतातील एकात्मिक ऊर्जा कंपन्यांपैकी एक आहे, जी कच्च्या तेलाचे शुद्धीकरण आणि पेट्रोलियम उत्पादनांचे विपणन करते. भारत पेट्रोलियमच्या मुंबई, कोची आणि बीना येथील रिफायनरीजची एकत्रित रिफायनरीज सुमारे ३५.३ MMTPA ची रिफायनरीज आहेत. त्यांच्या मार्केटिंग पायाभूत सुविधांमध्ये डेपो, इंधन स्टेशन, विमान सेवा स्टेशन आणि LPG वितरकांचे नेटवर्क समाविष्ट आहे.
