Advertisement
वैष्णवीकडून एकच चूक झाली...
पुणे : महाराष्ट्राला हादरवून टाकणारं वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर हगवणे कुटुंबातील तीन व्यक्तींना ताब्यात घेतलं असून दोन व्यक्ती म्हणजे सासरे आणि दीर फरार आहेत. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत असताना पहिल्यांदाच हगवणेंच्या मोठ्या सुनेने म्हणजे मयुरी हगवणेने धक्कादायक खुलासे केले आहेत.
वैष्णवीसोबत जे काही झालं ते माझ्याबरोबरही झालं आहे. लग्नाच्या सहा महिन्यानंतरच असा प्रकार घडायला सुरुवात झाली. सासरे माझ्यासोबत जे वागले ते मी सांगूही शकत नाही, असा खुलासा मयुरीने केला आहे. अपमानास्पद वागणूक, मारहाण या सगळ्या त्रासाला मी देखील सामोरी गेली आहे. पिंकी ताई म्हणजे माझी नणंद ही पाच वर्षांनी मोठी आहे. तिचं लग्न झालेलं नाही. त्यामुळे त्या घरात फक्त तिचीच चालते. नणंद जे सांगेल ते आम्ही ऐकायचं आणि तेच करायचं अशी तिकडची पद्धत आहे. हगवणे कुटुंबात सुनांपेक्षा लेकीला जास्त महत्त्व आहे. माझ्यावरही वर्षभर छळ झाला. पण त्यानंतर मी पोलिसांत तक्रार केली आणि मी नवऱ्यासोबत वेगळं राहायला सुरुवात केली आहे.
मयुरीने सांगितलं की, हुंडा किती घेतला याबाबत मला कल्पना नाही. कारण मी वेगळी राहते. पण फॉर्च्युनरबद्दल सासूचं असं म्हणणं होतं की, आपल्या दारात वेगवेगळ्या ब्रँडेड गाड्या उभ्या असल्या की, कसं चांगल वाटतं. तसंच शशांकची देखील तशीच इच्छा आहे. हे सगळं मी फोनवर बोलताना ऐकलं आहे. त्यामुळे फॉर्च्युनर घेत असल्याच मला कळलं. मला देखील हुंडासाठी सतत टोमणे मारायचे.
मयुरीच्या भावाचा धक्कादायक अनुभव
2024 मध्ये 5 नोव्हेंबर रोजी रात्री 8.30 वाजता पोलिसात तक्रार करायला गेलो, अशी माहिती मयुरीचा भाऊ मेघराज जगताप सांगतो. पण त्यानंतर मध्यरात्री 2 वाजता पोलिसांनी तक्रार लिहून घेतली. माझ्या बहिणीला खूप त्रास दिला. चार-पाच दिवस हे प्रकरण सुरु होतं. एवढंच नव्हे तर पोलिसांनी त्यावेळी टाळाटाळ केली. या सगळ्यानंतर हगवणे कुटुंब तेव्हाही फरार होते. पण नंतर पोलिसांनी तक्रार लिहून घेतली पण कोणतीही कारवाई केली नाही.
मुलीच्या मागे खंबीर उभे राहिलो
माझ्या मुलीला जेव्हा मारहाण झाली, तेव्हा आम्ही तातडीने तिथे गेलो. मुलीच्या लग्नाच्या सहा महिन्यानंतरच हा सगळा प्रकार सुरु झाला. आम्ही मुलीला या सगळ्या प्रकरणात साथ दिली. जर पोलिसांनी हगवणे कुटुंबावर तेव्हाच कारवाई केली असती तर आज वैष्णवी वाचली असती. आजही आमच्या मुलीसोबत खंबीरपणे उभे आहोत. सुरुवातीला वर्षभर तिने सगळं सहन केलं पण नंतर तिची सहनशक्ती संपली आणि ती वेगळी झाली. तसेच पोलिसात तक्रार केली पण काहीच फायदा झाला नाही.