Advertisement
नवी दिल्ली : भारताच्या या कारवाईमुळे अपेक्षेनुसार पाकिस्तानने थयथयाट करणे सुरू केले असून भारतावर बेछूट आरोप करण्यासही सुरूवात केली आहे. पाकिस्तानचा हा खोटारडेपणा एका महिला पत्रकाराने पकडला असून तो जगासमोर आणण्याचे काम केले आहे.
याल्दा हकीम या स्काय न्यूजच्या अँकर असून त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन पाकिस्तानी मंत्र्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत.पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ आणि पाकिस्तानी माहिती प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार या दोघांच्या याल्दा हिने मुलाखती घेतल्या आहेत. या दोन्ही मुलाखती स्फोटक ठरल्या असून त्यातूनच पाकिस्तानचा खरा चेहरा उघडकीस आला आहे.
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर याल्दा हकीम हिने पाकिस्तानी माहिती प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार याची मुलाखत घेतली होती. याल्दा हकीम हिने तरार याला अत्यंत शांतपणे काही प्रश्न विचारले ज्यांची उत्तरं देताना खान याची तंतरली होती. भारताने जैश-ए-मोहम्मद (JeM), लश्कर-ए-तैयबा (LeT), और हिजबुल मुजाहिदीन (HM) या दहशतवादी संघटनांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. पाकिस्तानी मंत्री तरार याने या कारवाईबद्दल बोलताना म्हटले की भारत पाकिस्तानातील सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करत आहे. याल्दा हकीमने हा दावा सप्रमाण खोडून काढला, तोदेखील चर्चा सुरू असताना. याल्दाने तरार याला थांबवत म्हटले की, भारतीय सैन्याने हे स्पष्टपणे सांगितलं आहे की त्यांनी फक्त दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले असून पाकिस्तानी सैन्याच्या तळांना त्यांनी कोणत्याही प्रकारे लक्ष्य केलेले नाही. यावर तरारने म्हटले की पाकिस्तानात दहशतवाद्यांचे अड्डे नाहीत आणि स्वत: पाकिस्तान हाच दहशतवादाचा पीडीत आहे. दहशतवादाविरोधात उभ्या ठाकलेल्या देशांमध्ये पाकिस्तान हा आघाडीवर असल्याचेही तरार याने म्हटले. याल्दाने तरार याला तिथेच थांबवत उलटा प्रश्न विचारला. तिने म्हटले की काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची मुलाखत घेतली होती. यामध्ये त्यांनी जाहीरपणे सांगितले होते की, पाकिस्तान अनेक दशके दहशतावद्यांना पोसतो आहे. दहशतवाद्यांना गुप्त कारवायांसाठी पाकिस्तान पोसत असल्याचे त्यांनी म्हटले होते. 2018 साली अमेरिकेचे अध्यक्ष असताना ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिली जाणारी सैनिकी मदत बंद करण्याचे आदेश दिले होते. पाकिस्तान डबल ढोलकी वाजवत असल्याचे म्हणत त्यांनी ही मदत बंद केली होती. याल्दा हिने तरार याची बोलती बंद करताना पुढे म्हटले की तू जे सांगत आहे ते परवेझ मुशर्रफ, बेनझीर भुत्तो आणि तुझ्या देशाचे संरक्षणमंत्री सांगत असल्याच्या विपरीत आहे. तरार याने याल्दाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फारसा यशस्वी झाला नाही.
