Advertisement
पंढरपूर : राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे, त्या पंढरपूरमध्ये महिला मेळाव्यात बोलत होत्या. राजकारण आणि कुटुंब या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, दोन्ही पक्ष एकत्र येणार ही फक्त चर्चा आहे. जे काही होईल ते आपण बघालच, असे म्हणत दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणारवर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार यांनी हात जोडत, या विषयावर अधिक बोलणं टाळलं आहे.
दरम्यान, पुण्यातील विवाहिता वैष्णवी हगवणे हीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे, या घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे, यावर देखील सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वैष्णवी हगवणे बाबत झालेल्या घटनांचे समर्थन करत नाही, अशा घटना व्हायला नको आहेत. पक्षाने याबाबत भूमिका मांडलेली आहे. महिला आयोगाकडून दिरंगाई होते याबाबत सुद्धा पक्षाच्या पदाधिकाऱ्याने भूमिका मांडलेली आहे, अशी प्रतिक्रिया या प्रकरणावर सुनेत्रा पवार यांनी दिली आहे.