Advertisement
मूळ स्वरूपात शिल्प उभारण्याची मागणी
धाराशिव : अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या ऐतिहासिक शिल्पावरून आता मतभेद निर्माण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचं 108 फूट उंच भव्य ऐतिहासिक शिल्प तुळजापुरात उभारलं जाणार आहे मात्र हे शिल्प नेमकं कसं असावं यावरून हा वाद निर्माण झाला आहे. आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे शिल्प आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.
तुळजाभवानी मंदिर परिसरात उभारण्यात येणाऱ्या 108 फुटी ऐतिहासिक शिल्पावरून वाद पेटला आहे. देवीचं मूळ स्वरूप बदलून दाखवलं जात असल्याचा आरोप पुजारी मंडळ, मराठा क्रांती मोर्चा यांनी केला, तर मंदिर संस्थानचं पत्रही यामध्ये नवा वाद निर्माण करतंय. या वादाचे पडसाद आता थेट मुंबईत होणाऱ्या बैठकीपर्यंत गेले आहेत. जिथं 17 जूनला मुंबईत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी तुळजाभवानी मंदीर विकास आराखडाबाबत 17 जुन रोजी मुंबईत बैठक बोलावली असुन त्या बैठकीला भोपे, पाळीकर, उपाध्ये या तिन्ही पुजारी मंडळ आणि मठाचे महंतांसह इतरांना आमंत्रण देण्यात आलेलं नाही.
काय आहे मूर्तीचा वाद?
मंदिर संस्थानने जाहीर केलेल्या संकल्पचित्रात आई तुळजाभवानी अष्टभुजा अवस्थेत शिवरायांना भवानी तलवार देताना दाखवलं आहे. मात्र प्रत्यक्ष इतिहासात देवी दोन भुजांमध्ये तलवार देताना आहे. म्हणून हे शिल्प मूळ स्वरूपातच असावं, अशी मागणी पुजारी मंडळ, मराठा क्रांती मोर्चा यांनी केली आहे. मराठा क्रांती मोर्चा समन्वयक सुनील नागने यांच्या माहितीनुसार शिल्प उंच किती आहे, यापेक्षा ते मूळ स्वरूपात असावं. अष्टभुजा रूप नव्हे, तर दोन हातांच्या रूपात शिवरायांना तलवार देताना दाखवलं पाहिजे.
महाराष्ट्र शासनाने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या वतीने प्रस्तावित केलेल्या विकास आराखड्यास दिनांक 28 मे 2025 रोजी च्या शासन निर्णयानुसार 1865 कोटी रूपये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यान्वये रामदरा तलाव परिसरात श्री तुळजाभवानी आई छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देत असल्याचे 108 फुटी शिल्प उभारणे प्रस्तावित आहे. याअनुषंगाने धर्मशास्त्र तसेच रुढी परंपरेनुसार सदर श्रीदेविजींची छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देत असल्याचे शिल्प कसे असावे याबाबत कृपया, आपण आपला अभिप्राय कार्यालयास देण्याची विनंती तहसीलदार तथा मंदीर संस्थांनाचे प्रशासन व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांनी लेखी पत्रात केली आहे. तेव्हा आता या वादावर नेमका कोणता तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.