Advertisement
आळंदी : वारीत एक वेगळीच दृश्यं पाहायला मिळत आहेत. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे एकीकडे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे इंद्रायणी पाट, जो वारकऱ्यांच्या साऱ्या भक्तिभावाचा केंद्रबिंदू असतो. तो यंदा पहिल्यांदाच सुनासुना दिसत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने ताटावर जाण्यास मज्जाव केलेला आहे, जेणेकरून कोणताही अपघात टळेल. असं असलं तरी वारकऱ्याचा उत्साह मात्र कुठेच कमी झालेला नाही. मात्र इंद्रायणीचा भरून वाहणारा प्रवाह, पावसाची रिपरिप आणि ताटावर बंदी यांचा वारकऱ्यांच्या उत्साहावर तसूभरही परिणाम झाला नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल झाले आहेत. “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात त्यांनी संपूर्ण आळंदी नगरी भक्तिरसात न्हाऊन टाकली आहे. वारकऱ्यांनी ग्यानबा तुकारामाच्या गजरात आळंदी नगरी दणाणून सोडली आहे.
आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र समाधीपासून पालखी सोहळ्याला विधीवत सुरुवात झाली. नेमक्या वेळेनुसार पाच वेळा मुख्य कारभाऱ्याला प्रदक्षिणा घातली जाते. त्यानंतर मार्गस्थ होण्याची परंपरा पाळली जाते. संतांच्या पालखी सोहळ्याचा हा क्षण म्हणजेच भक्तीचा चरमबिंदू असतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने पंढपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले आहे. यावेळी मोठ्या संख्येने भाविक जमा झाले होते. हा प्रस्थान सोहळा प्रत्येकानेच याची देही याची डोळा आपल्या मनात साठवून ठेवावा असाच होता.
पावसाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि पालखी सोहळा समितीकडून योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही पालखी पंढरपूरच्या दिशेने भक्तिभावाने मार्गस्थ झाली असून, आळंदीतील वातावरण पूर्णतः आध्यात्मिक आणि भक्तिमय बनले आहे.पाऊस असला तरी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. प्रस्थान सोहळ्यावेळी प्रत्येकाने ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. त्यामुळे संपूर्ण आळंदी नगरी भक्तीभावात नाहून गेली होती.