Advertisement
मुंबई : नगर विकास विभागाचा सुधारित आदेश जारी केला आहे. यात 6 ऑक्टोबरला अंतिम प्रभाग रचना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी देखील कंबर कसली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हालचाली वाढल्या आहेत. स्थानिक स्वराज्य निवडणुका एकत्र लढण्याबाबत महायुतीच्या नेत्यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे.
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आहे. या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रच लढायच्या असा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी घेतल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाची चर्चा झाली. तसेच जागा वाटपासंदर्भात देखील चर्चा झाल्याचे समजते.
महायुतीला विधानसभा निवडणुकीचा कित्ता महापालिका निवडणुकीत गिरवायचा आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत प्रमुख नेत्यांची खलबतं झाली. महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या चर्चेअंती महापालिका निवडणुका एकत्र लढण्यावर एकमत झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. लवकरच महामंडळ वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.