Advertisement
सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील 'कोईळ' हे गाव. या गावाने आजही आपला ऐतिहासिक वारसा जपला आहे. गेल्या 600 वर्षांपासून कोईळ गावामधील गावकऱ्यांच्या कुणाच्याही घरी गणपतीचा फोटो नाही. अगदी कुणाच्या समारंभातही लग्नपत्रिका छापली जाते त्यामध्येही गणपतीचा फोटो लावला जात नाही. अनेकजण गळ्यात गणपतीचा फोटो किंवा लॉकेट घालतात तसंही कुणी या गावातील मंडळी करत नाही.
या गावातील लोकं गणपतीला मानतात की नाही, अनेकांचा गैरसमज होतो. पण तंस नाही या गावकऱ्यांची श्रद्धा गणपतीवर मनापासून आहे. पण गणरायाचा विघ्नहर्ता म्हणून एक लौकिक आहे. त्यामुळे बाप्पाची कुठेही विटंबना होता कामा नये. गणरायाचे पावित्र्य राखले गेले पाहिजे.
पण या एक गावात आणखी एक परंपरा आहे ज्याचं अवघ्या महाराष्ट्रात कौतुक होतं. ती परंपरा म्हणजे 'एक गाव एक गणपती'. ही पारंपरिक पद्धत प्राचीन काळापासून सुरु आहे आणि आजही गावकरी याचं मनापासून पालन करतात.
या गावात एक गणपती मंदिर आहे. या मंदिरात सर्व गावकरी एकत्र येतात आणि गणेशोत्सव साजरा करतात. श्री स्वयंभू गजानन मंदिर आहे. या मंदिरात काळ्या दगडाची गणेशमूर्ती गणेश चतुर्थीच्या काळात सजविली जाते. या गावांमध्ये 600 वर्षांपासून ही पंरपरा चालत आहे. या गावात 80 ते 90 घरे असून सगळे ग्रामस्थ हा सण आनंदाने साजरा करतात. गणेशोत्सवाच्या अगोदर संपूर्ण गावांमध्ये फिरुन शिधा गोळा केली जाते. त्या शिधेतून भाविकांना महाप्रसाद दिला जातो. त्यामुळे गणेशोत्सवाच्या 11 दिवस भक्तीमय वातावरण असते. कोईळमधील गणपती मंदिराचा वर्धापनदिन 28 ते 29 डिसेंबर दरम्यान साजरा केला जातो.