Advertisement
सर्वोच्च न्यायालयात प्रकाश आंबेडकर यांनी याचिका केली आहे दाखल
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही याचिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केली आहे. यात विशेषतः निवडणूक आयोगाने सायंकाळी 6 नंतर टाकलेल्या तब्बल ७६ लाख मतांचा डेटा जतन करून न ठेवण्याबाबत गंभीर आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे या याचिकेवरी सुनावणी दरम्यान काय होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
सध्या देशात मत चोरीवरून वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणूक आयोगाकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. शिवाय आपण दिलेले मत नक्की कुठे गेले याचा विचार आता मतदाताही करू लागले आहेत. त्यात महाराष्ट्रा लोकसभा निवडणुकीत वेगळा निकाल आणि विधानसभा निवडणुकीत अगदी त्याच्या विपरित निकाल लागले. त्याच वेळी मतदानात गडबड झाल्याचा आरोप विरोधकांनी करायला सुरूवात केली होती. महाराष्ट्रात मतदान कसे वाढले असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत.
त्यात आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एक्स पोस्ट करत या संदर्भातील माहिती दिली आहे. ही याचिका आपण दाखल केली असुन त्यावर सुनावणी होणार आहे असं त्यांनी सांगितलं. निवडणूक कायद्यानुसार प्रत्येक मताचा डेटा सुरक्षित ठेवणे अनिवार्य आहे. इतक्या मोठ्या संख्येतील मतांबाबतची माहिती उपलब्ध न ठेवणे हे कायद्याचे गंभीर उल्लंघन आहे असं ही ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर उद्याची सुनावणी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, महाराष्ट्राच्या राजकारणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.