Advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यने चर्चा
मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. सर्व राजकीय पक्षांनी महापालिका आणि स्थानिक पातळीवरील सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. पक्षश्रेष्ठी स्थानिक नेत्यांना बळ देण्याच्या रणनीतीवर काम करत असून, निवडणुकीची घोषणा लवकरच अपेक्षित असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यने निवडणूक पुढे ढकलणार कि काय अशी चर्चा सुरु झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना निवडणुकीबाबत महत्त्वाची माहिती दिली. काही निवडणुका कदाचित जानेवारी 2026 मध्ये होऊ शकतात, पण मला याबाबत ठोस माहिती नाही, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या विधानाने निवडणुका पुन्हा लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पवार यांनी निवडणुकीच्या विलंबाबाबतही भाष्य केले. 2017 नंतर 2022 मध्ये निवडणुका होणे अपेक्षित होते, परंतु 2022, 2023, आणि 2024 ही वर्षे निघून गेली. आता 2025 संपत असतानाही निवडणुका रखडल्या आहेत, यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.पवार यांनी निवडणूक लांबण्यामागील कारणांवर फारसे भाष्य न करता, निवडणूक आयोगाचा हा अधिकार असल्याचे नमूद केले. सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी निवडणुका लांबल्या असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या तारखांबाबत अनिश्चितता कायम असली, तरी अजित पवार पक्ष कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आवाहन करत आहेत.
