Advertisement
मुंबई : व्हीव्हीपॅट नसताना ईव्हीएम वापरण्यावर, तसेच प्रभाग पद्धतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ४ वर्षांत तयारी का नाही, असा सवाल करत, जर व्हीव्हीपॅट शक्य नसेल तर मतपत्रिका वापरण्याची मागणी केली. निवडणूक आयोगाच्या कारभारावर विश्वास कसा ठेवायचा, असा थेट सवाल केला. महाराष्ट्राातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी आयुक्तांना एक निवेदनही देण्यात आले. त्यामध्ये विरोधी पक्षाने अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी आज मुंबईत मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. निवडणूक मतदार यादीतील त्रुटींसह इतर काही प्रक्रियांवर आक्षेप घेत विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने अनेक मुद्दे उपस्थित करत निवडणूक आयोगाला खरमरीत सवाल उपस्थित करत घेरलं.
यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आले असून त्यातूनही काही खरमरीत सवाल विचारण्यात आले. प्रभाग पद्धतीने जिथे निवडणुका होणार आहेत, तिथे व्हीव्हीपॅट पद्धत वापरता येणार नाही असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे, अरे मग प्रभाग पद्धतच रद्द करा की! असं त्या निवेदनात नमूद करण्यात आलं असून इतरही अनेक कळीचे मुद्दे निवेदनात मांडण्यात आले आहेत.
महापालिका निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट वापरले जाणार नाही असं निवडणूक आयोगाने सांगितलं, असं का? निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की, व्हीव्हीपॅटसोबत जोडण्याकरिता आवश्यक असलेल्या ईव्हीएम त्यांच्याकडे पुरेशा नाहीत? मुळात २०२२ मध्ये होणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता २०२६ मध्ये होणार आहेत. मग ४ वर्षात निवडणूक आयोग तयारी तरी कसली करत होते? असा सवाल निवेदनात विचारण्यात आला आहे.
