Advertisement
महापालिका निवडणुकीत दोन ठाकरे आणि शरद पवार यांची एकत्र येण्याची चर्चा
मुंबई : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मागील दोन आठवड्यात राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात तीन बैठका झाल्या आहेत ज्यामध्ये पुढील महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने दोन्ही पक्षाच्या रणनीती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. संजय राऊतांचे हे प्रयत्न यशस्वी ठरतील का? खरोखरच असं झालं तर राज्यातील महाविकास आघाडी संपुष्टात येईल. 2019 नंतर पहिल्यांदाच काँग्रेस राजकीय पटलावर एकटी पडेल. राऊतांचा प्रयत्न यशस्वी झाल्यास दोन्ही सेना आणि पवारांची राष्ट्रवादी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीविरुद्ध रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
माहविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्याने आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये वेगळी समिकरणं पाहायला मिळू शकतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंमधील भेटीगाठी वाढल्या आहेत. मात्र या दोन्ही सेनेंच्या युतीच्या जोरदार चर्चा सुरु असतानाही यापूर्वी महाराष्ट्राने कधीही न पाहिलेली अनोखी युती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र, महाविकास आघाडीमधील काँग्रेसची भूमिका ही अनेक विषयांवर मनसेपेक्षा वेगळी आहे. यापूर्वीही अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या विधानांवरुन हे स्पष्ट केलं आहे. मराठीचा मुद्दा असो, परप्रांतियांचा मुद्दा असो किंवा अगदी इतर वैचारिक मुद्द्यांवर राज ठाकरेंसोबत जाणं काँग्रेसला अवघड होईल असं चित्र दिसत आहे. त्यामुळेच राज ठाकरे महाविकास आघाडीत जाण्याची शक्यता कमीच असल्याचं सांगितलं जात आहे.
