Advertisement
सोलापूर : महाराष्ट्रामध्ये मातंग समाज लोकसंख्येच्या प्रमाणात अ, ब, क, ड असे वर्गीकरण करून आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करत आहे आणि अशा प्रकारे वर्गीकरण करता येते, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिला आहे. राज्य सरकारला हे अधिकार आहेत, असेही न्यायाधीशांनी सूचित केले आहे. या विषयावर एनडीटीव्ही या वाहिनीवर दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी आनंदराज आंबेडकर आणि लक्ष्मणराव ढोबळे यांची मुलाखत झाली. यावेळी आनंदराज आंबेडकर म्हणाले, असे वर्गीकरण झाल्यावर सामाजिक ऐक्य बिघडडेल आणि जर असे झाले तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू, तेव्हा लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले, जर का लांडग्याच्या तोंडाला रक्त लागले की, तो जसा इतराला वाटेकरी होईल म्हणून नाकारतो, तसंच मातंग समाजाला नाकारले जात आहे. त्यांना वाटत आहे, जर मातंग समाज लोकसंख्येच्या प्रमाणात वर्गीकरण करून जर स्वतंत्र आरक्षण दिले तर आमचे कसे? असे ढोबळे म्हणाले, आमचा थोरला भाऊ महार समाज पहिल्यापासून आरक्षणाचा फायदा त्यांना झाल्यामुळे तो प्रगत झाला आणि मातंग समाज शिक्षणाने मागे असल्यामुळे आजही गटार काढत आहे. आमच्या मायमाऊल्या, आमच्या भगिनी धनदांडग्यांच्या महिलांचे बाळंतपण करून आपली उपजीविका भागवत आहेत. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने आणि राज्य सरकारने या मातंग समाजाला न्याय देण्याचे ठरवले आहे. महार समाजाच्या पोटात जळफळाट होत आहे आणि तो काही दिवस होणार आहे. काहीही फरक पडणार नाही. कारण हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. ढोबळे पुढे म्हणाले की, सुरुवातीला रेल्वेच्या डब्यात बसलेला माणूस जसा दरवाजा उघडत नाही, तशा प्रकारे महार समाज मातंग समाजाला आपल्या आरक्षणात वाटेकरी होऊ देत नाही आणि जर मातंग समाज आरक्षणाचा वाटेकरी झाला तर आमचे कसे? असा प्रश्न त्यांना पडत आहे आणि म्हणून मातंग समाजाला कसल्याही परिस्थितीत वाटेकरी होऊ द्यायचे नाही म्हणजे आपल्याला रान मोकळे झाले, ही भूमिका महार समाजाची आहे. म्हणून घटनातज्ञ असणारे भूषण गवई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दारिद्रयात जीवन जगत असणाऱ्या मातंग समाजाला न्याय देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. सर्वोच्च न्यायालयाला किंवा महाराष्ट्र सरकारला सुद्धा आडमुठ्यापणाने बोलले जाते. याचा अर्थ असा आहे की, ज्या प्रकारे थोरला भाऊ लहान भावाला जसा हिस्सा नाकारतो. अगदी त्याचप्रकारे महार समाज मातंग समाजाला आरक्षणाचा हिस्सा नाकारत आहे, असे मत माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी मांडले आहे. खरे पाहिले तर लक्ष्मणराव ढोबळे यांच्या मुलाखतीमुळे महाराष्ट्रातील मातंग समाजाने लक्ष्मणराव ढोबळे यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि या मुलाखतीचे समर्थन केले. आता, खऱ्या अर्थाने मातंग समाजातील गटतट, बाजुला सारून मातंग समाजातील नेत्यांनी एकजूट दाखवली पाहिजे आणि आरक्षण वर्गीकरण करून घेतले पाहिजे, असा मतप्रवाह निर्माण झाला आहे.
