Advertisement
नागपूर : महाराष्ट्रच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तब्बल 75 हजार 286 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आहेत. अधिवेशन सुरु होण्याआधी पुरवणी मागण्या 76 हजार कोटींच्या आसपास असतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला. हा अंदाज खरा ठरला आहे. पुरवणी मागण्यांमध्ये सर्वाधिक मागण्या या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आहे. त्याचबरोबर लाडकी बहीण आणि कुंभमेळ्यासाठी करण्यात आल्या आहेत.
कशासाठी किती पैसे मागण्यात आलेत?
75 हजार 286 कोटींच्या पुरवणी मागण्यांपैकी 15 हजार 648 कोटी रुपयांच्या मागण्या या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी करण्यात आल्यात. रक्कमेचा विचार केल्यास या विषयासंदर्भातील मागण्या या सर्वाधिक आहेत. त्या खालोखाल लाडकी बहीण योजनेसाठी 6 हजार 103 कोटींच्या पुरवणी मागण्या करण्यात आल्यात. त्याचप्रमाणे कुंभमेळ्यासाठीही 3 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागणी करण्यात आल्या आहेत.
पुरवणी मागण्या म्हणजे काय?
पुरवणी मागण्यांना इंग्रजीत Supplementary Demands असं म्हणतात. पुरवणी मागण्या या सरकारी अर्थसंकल्पीय प्रक्रियेचा एक भाग आहे. जेव्हा वार्षिक अर्थसंकल्पात (बजेटमध्ये) निश्चित केलेल्या निधीपेक्षा अधिक खर्चाची गरज पडते, तेव्हा सरकार अतिरिक्त निधीची मागणी विधिमंडळात (विधानसभा किंवा विधानपरिषद) सादर करते. या मागण्यांना 'पुरवणी मागण्या' असे म्हणतात. हे मुख्यतः अप्रत्याशित खर्च, आपत्कालीन परिस्थिती किंवा योजनांच्या विस्तारासाठी असतात.
