Advertisement
लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले आहे. लातूरमधील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी दुःखद बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. काँग्रेस पक्षासाठी त्यांनी मोठे कार्य केले आहे. त्यांची दीर्घकाळची राजकीय कारकीर्द अत्यंत प्रभावी राहिली, ज्यात ते सुमारे 35 ते 40 वर्षे खासदार म्हणून कार्यरत होते. शिवराज पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रातील राजकारणासह देशातील राजकीय क्षेत्राला मोठी हानी पोहोचली आहे.
राजकीय कारकीर्द :
12 ऑक्टोबर 1935 रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे जन्मलेले शिवराज पाटील यांनी 1960 नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. आधी विधानसभा आणि नंतर 1980 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले आणि सलग सात वेळा लातूरचे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली.
मंत्रिपदांचा प्रवास :
इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री म्हणून सुरुवात. वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश, महासागर विकास अशा महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार
- राजीव गांधी सरकारमध्ये कार्मिक आणि संरक्षण उत्पादन मंत्री
- नागरी विमान वाहतूक आणि पर्यटन विभागाचा स्वतंत्र कार्यभार
- पाटील यांची संयमी वृत्ती, संसदीय नियमांची जाण आणि शिस्तप्रियता यामुळे ते इंदिराजी व काँग्रेस पक्षातील विश्वासू चेहरा मानले जात.
