Advertisement
मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, नागपुरात भाजप शिवसेना एकत्र येणार असून नवी मुंबईबाबत अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी आणि भाजप वेगवेगळे लढणार असल्याचं स्पष्ट होत आहे. तर, संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीनं रणनिती आखली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर नुकतीच भाजप आणि शिंदे गटाची बैठक पार पडली, यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते. साधारण चार ते साडेचार तासांच्या या बैठकीत महापालिकांच्या सूत्रांबाबत चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये असणारे कथित मतभेद पाहता नवी मुंबईविषयी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, उर्वरित मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, नागपूरबाबत निर्णय झाला असून, इथं दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट होत आहे. एकिकडे पक्षात बंडखोरी होऊ नये यासाठी अजित पवार यांच्या बाजूनं महत्त्वाची रणनिती आखली जात असतानाच दुसरीकडे नागपूरमध्ये भाजपची पकड मजबूत असली तरीही शिवसेनेला सोबत घेऊनच तिथं निवडणूक लढण्यात येणार असल्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे.
उद्धव ठाकरे यांचे जिल्हाप्रमुखांना आदेश
महाविकास आघडी सोबतच किंवा सहयोगीपक्षासोबतच युती करा मात्र, भाजप, शिंदे सेना किंवा दादांची राष्ट्रवादी यांच्यासोबतची युती करू नका, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना बैठकीत दिले. जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका जोमाने लढायच्या आहेत, राज्याच्या जनतेची लुट करून निवडणुका सत्ताधारी पक्षाकडून लढवली जात आहे.येणाऱ्या निवडणुकीत धनशक्तीला जनशक्ती आणि श्रमशक्तितुन उत्तर द्यायचं आहे. त्यासाठी सज्ज राहा, असे आदेश ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
