Advertisement
पुणे : राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्यपदांसाठी आज (शनिवार 20 डिसेंबर) मतदान झाले. नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुका 2 डिसेंबरला पार पडल्या होत्या, मात्र 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला होता. आज नगरपरिषदेसाठी मतदान होत असताना काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याने मतदानाला गालबोट लागल्याचं दिसून आले.
अंबरनाथ, कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा, बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची, सोलापूरातील अनगर, मंगळवेढा, साताऱ्यातील महाबळेश्वर, फलटणसह 23 नगरपरिषदांसाठी आज मतदान झाले. थंडीचे दिवस असल्याने सकाळी वातावरणात गारवा होता, मात्र त्याचा मतदानावर फारसा परिणाम झाला नाही. सकाळपासून मतदारांचा मोठा उत्साह संध्यकाळ पर्यंत पहायला मिळाला.
मात्र, मतदान होत असलेल्या काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याने मतदानाला गालबोट लागले. अंबरनाथच्या कोहोजगाव परिसरात 208 संशयित मतदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्या सर्वांची आधार कार्ड व पॅन कार्डद्वारे सखोल तपासणी करण्यात आली. हे नागरिक मतदानासाठी आले होते का, कोणासाठी मतदान करणार होते याचीही चौकशी करण्यात आली. संशयित बोगस मतदारांमुळे एकच गोंधळ उडाला. या सगळ्या प्रकारामुळे इथलं वातावरण तापले होते.
अंबरनाथ नगर पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चौदाशे पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला. विशेष म्हणजे ईव्हीएम मशीन प्रकरणात कुठलीही तक्रार नसल्याने या ठिकाणी गुन्हा कुठलाच दाखल नाही. पैसे वाटप संदर्भात देखील पोलिसांकडे कुठली तक्रार आलेली नाही, त्यामुळे अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दुसरीकडे यवतमाळमध्ये एका मतदान केंद्रावर इव्हिम यंत्रात बिघाड झाल्याचे आढळले. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, मात्र इव्हिम बिघडल्याने मतदान करता येत नसल्याने अनेक मतदार खोळंबले.
कुठे किती झालं मतदान ?
- सोलापुरातील मंगळवेढा मध्ये पहिल्या टप्प्यात साडे नऊ वाजेपर्यंत ७. ८० टक्के मदन झाले होते.
- वाशिम नगरपरिषदेमध्ये सकाळी पहिल्या टप्प्यात साडे नऊ वाजेपर्यंत 6. 53 टक्के मतदान झाले तर रिसोड नगर परिषद मधील 2 प्रभागातील 2 उमेदवारांसाठी 8. 41 टक्के मतदान झालं.
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत एकूण 8.92 टक्के मतदान झालं. फुलंब्री नगरपंचायतसाठी 12.47 टक्के मतदान करण्यात आलं.
– अंबरनाथमध्ये सकाळी 9 वाजेपर्यत 7.58 टक्के मतदान
– भुसावळ, यावल, सावदा येथे दहा वाजेपर्यंत 4.6 % मतदान झालं आहे. मतदान केंद्रावर शांततेने मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
