Advertisement
मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी हालचालींना वेग आला आहे. प्रचारासाठी आता अवघे 10 ते १२ दिवस शिल्लक राहिले असून, दुसरीकडे जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 28 जानेवारीला जिल्हा परिषदेची निवडणूक पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
31 जानेवारी पर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा ठरवण्यासाठी 6 व 7 जानेवारी रोजी महत्त्वाची बैठक बोलावली असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीला संबंधित जिल्हा परिषदेचे अधिकारी तसेच पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
आयोगाच्या बैठकीतच मतदानाच्या अंतिम तारखांवर शिक्कामोर्तब
जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आवश्यक ईव्हीएम उपलब्ध असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, सध्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर गुंतलेले आहे. हे मनुष्यबळ मोकळे झाल्यानंतरच जिल्हा परिषदांसाठी मतदान प्रक्रिया राबवली जाऊ शकते. त्यामुळे 7 व 8 तारखेला होणाऱ्या आयोगाच्या बैठकीतच मतदानाच्या अंतिम तारखांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांमध्येच निवडणुका
सध्या राज्यातील ओबीसी आरक्षणासंदर्भातील निर्णयामुळे केवळ 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांमध्येच निवडणुक घेता येणार आहे. राज्यातल्या अनेक जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे. या ठिकाणी इतर समाजघटकांनाही निवडणूक लढता यावी त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या.
