Advertisement
जिल्हाध्यक्षांचे अजित पवारांना खळबळजनक पत्र
जळगाव : जळगाव महानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक शांताराम पाटील यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा देताना अजित पवारांना उद्देशून एक खळबळजनक पत्र लिहलं आहे. ते पत्र व्हायरल झालं असून त्यामुळे राष्ट्रवादीमधील नाराजी उघड झाली आहे.
अभिषेक पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपले सविस्तर राजीनामा पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये त्यांनी पक्षातील जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. पक्षातील अंतर्गत लोकशाही पूर्णपणे संपली असून केवळ काही ठराविक नेत्यांच्या स्वार्थासाठी पक्ष चालवला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटप आणि उमेदवारीवरून सुरू असलेल्या प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अभिषेक पाटील यांनी केला आहे. पाटील यांनी आपला संताप व्यक्त करताना नेत्यांच्या घराणेशाहीवरही प्रहार केला आहे. माजी मंत्र्यांच्या शेंबड्या बाब्याला नेता करण्यासाठी आयुष्यभर पक्षासाठी झटणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना केवळ पाणी भरण्यासाठी वापरले जात असल्याची बोचरी टीका त्यांनी केली. स्वार्थासाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी जिल्हयातील काही नेते प्रामाणिक कार्यकर्त्यांची गळचेपी करत असून, हा राजीनामा रागातून नसून केवळ आत्मसन्मानासाठी दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
