Advertisement
मुंबई : महाराष्ट्रात जिथं गेलो तिथं जनतेतून आवाज यायचा, एकच वादा अजित दादा. राजकारणात एकसंघपणे काम करावं हे अजित पवारांचे स्वप्न होतं. हे करत असतानाचा नियतीने घात केला, असं आमदार जयंत पाटील म्हणाले. अजित पवारांचं शरद पवारांवर खूप प्रेम होतं. आजही शरद पवारांचा हुकमी एक्का हे अजित पवारच होते असंही जयंत पाटील म्हणाले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोकसभेचा कार्यक्रम वरळी डोम येथे पार पडला. त्याप्रसंगी देशातील आणि राज्यातील महत्त्वाचे नेते, उद्योगपती उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले की, कुठून सुरू करू आणि कुठे थांबू अशा अनेक आठवणी अजितदादांसोबत आहेत. 1991 पासून आमची राजकीय कारकिर्द जवळपास एकत्रच सुरू झाली. त्यानंतर सभागृहातही आम्ही एकत्रच बसायचो. 2014 पासून तर शेजारी बसण्याचे अनेक प्रसंग आले. खुल्या मनाचा, दिलदार मनाचा आणि विरोध करायचा असले तर ठामपणे विरोध करणारा नेता म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जातं. राजकारणात पुन्हा एकसंघपणे काम करायचं, पुन्हा एकदा एकत्र येऊन हळुहळु संघटना मजबूत करायचं धोरण अजित पवारांनी स्वीकारलं होतं. पुन्हा एकदा नव्याने काम सुरू करावं असं अजितदादांचं स्वप्न होतं. पण हे सगळं होत असतानाच नियतीने घात केला.
