Advertisement
पत्रकार परिषदवेळी नेत्यांमधील संवाद आले ऐकू
मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची पहिलीच पत्रकार परिषद गुरुवारी (26 फेब्रुवारी) झाली. मात्र या परिषदेपेक्षा तिथे झालेली अंतर्गत कुजबूज आता महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार हे तिघेही या पत्रकार परिषदेला सामोरे जाणार होते, पण त्याआधीच नेत्यांमध्ये जे संवाद झाले, ते माध्यमांच्या माईकमध्ये जसेच्या तसे कैद झाले आहेत. विशेष म्हणजे, समोर ठेवलेले माईक सुरू आहेत हे नेत्यांच्या लक्षातच आले नाही आणि त्यामुळे पक्षांतर्गत नेमके काय चालले आहे, याचे चित्र चव्हाट्यावर आले आहे.
माध्यमांची मोठी गर्दी असताना आणि बूम माईक टेबलावर मांडलेले असताना राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे आणि आमदार सरोज अहिरे तिथे उभे होते. यावेळी झालेल्या संभाषणातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. दादांजवळ जाऊ दिले नाही, आता वहिनींजवळ तरी जाऊ द्या, तुम्ही प्रश्न घेऊ नका, तुमचे बोलणे झाले की लगेच उठा, उलट-सुलट प्रश्न विचारले जातील, अशी वाक्ये या रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट ऐकू येत आहेत. यावरून सुनेत्रा पवार यांना पत्रकारांच्या प्रश्नांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न काही नेत्यांकडून जाणीवपूर्वक केला जात होता का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
या कुजबुजीनंतर उपस्थित झालेले महत्त्वाचे प्रश्न
1. आमदारांना खरोखरच अजित दादांजवळ जाण्यापासून रोखले जात होते का?
2. आमदारांना दादांच्या जवळ जाण्यापासून रोखणारे ते नेते नेमके कोण आहेत?
3. सुनेत्रा पवार यांना त्यांना जे वाटते ते पत्रकार परिषदेत मोकळेपणाने मांडू द्यायचे नव्हते का?
4. पत्रकारांच्या प्रश्नांना कोण आणि कशासाठी इतके घाबरत होते?
