Advertisement
केंद्र सरकारकडून धैर्यशील मोहिते-पाटलांना मोठी जबाबदारी
सोलापूर : लोकसभा निवडणुकीपासून सोलापूर जिल्ह्यात भाजपविरोधात एल्गार पुकारणारे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना आता केंद्र सरकार आणि लोकसभेने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. 'भारत आणि संयुक्त अरब (UAE) मैत्री समिती'वर सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या भाजप सरकारशी जिल्ह्यात त्यांचा टोकाचा संघर्ष सुरू आहे, त्याच सरकारकडून त्यांना परराष्ट्र धोरणाशी संबंधित या समितीवर स्थान मिळाल्याने राजकीय चर्चा रंगली आहे.
एकीकडे स्थानिक पातळीवर जिल्हा परिषद आणि नगरपालिकेत भाजपला रोखण्यासाठी मोहिते पाटील रणनीती आखत असताना, दुसरीकडे दिल्लीत लोकसभा अध्यक्ष आणि केंद्र सरकारने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. भारत आणि UAE या दोन देशांमधील संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने ही मैत्री समिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या नियुक्तीमुळे भाजप आणि मोहिते पाटील यांच्यातील दुरावा कमी होत आहे का? किंवा लोकसभेतील कामकाजाच्या निमित्ताने मोहिते पाटलांची ताकद ओळखून भाजपने ही खेळी केली आहे का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.धैर्यशील मोहिते पाटील यांची ही निवड केवळ संसदीय प्रक्रिया आहे की त्यामागे काही राजकीय संकेत आहेत, हे येणारा काळच ठरवेल.
