Advertisement
वकिलांची फौज घेऊन रोहित पवार बारामतीत पोलीस ठाण्यात
बारामती : अजित पवार प्रवास करीत असलेल्या VSR कंपनीच्या विमानात त्रुटी असल्याचं नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) सांगितल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. रोहित पवारांनी हा विषय लावुन धरला आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या अपघातासंदर्भात डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार वकिलांची फौज घेऊन बारामतीत पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी FIR दाखल करण्याची मागणी केली, मात्र पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास नकार दिला. दरम्यान रोहित पवारांनी ट्वीट करीत तिघांविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.
अजितदादांच्या संशयास्पद अपघाती निधनाने लोकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. हा निव्वळ अपघात नाही तर VSR कंपनीचा अक्षम्य निष्काळजीपणा आणि DGCA कडून झालेलं दुर्लक्ष याला कारणीभूत असल्याचं खुद्द DGCA च्या अहवालातूनच स्पष्ट झालं. तसंच विमान उडवण्यास हवामान योग्य असल्याचा ग्रीन सिग्नल देणारी ॲरो कंपनी या घटनेला तेवढीच कारणीभूत आहे. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत या सर्वांविरोधात FIR दाखल झाली पाहिजे. काल मुंबईत FIR दाखल करुन घेण्यास पोलिसांनी नकार दिला त्यामुळं ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली त्या बारामती तालुका पोलीस ठाण्यात दादांवर प्रेम करणाऱ्या सामान्य माणसांसह जाऊन सर्व कायदेशीर बाबी स्पष्ट करत याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याची मागणी केली, परंतु इथंही दबावाखाली असलेल्या पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेण्यास असमर्थता दर्शवली. ही अजितदादांच्या मृत्यूची क्रूर चेष्टा असून ती कदापि खपवून घेतली जाणार नाही. VSR कंपनी, #DGCA, ॲरो आणि इतर हे सर्वच या अपघाताला कारणीभूत असून त्यांना कोण वाचवतंय? हा तपास असाच दबावाखाली होत राहिला आणि यातील दोषींना वाचवण्याचा प्रयत्न झाला तर जनतेच्या संतापाचा कडेलोट होईल आणि त्याची जबाबदारी दबाव आणणाऱ्यांना घ्यावी लागेल. या विषयात कुणी, कितीही अडथळे आणले तरी आम्ही मात्र थांबणार नाही, अशा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.