Advertisement
संतोष देशमुख हत्याप्रकरण : जामीन अर्ज फेटाळला
मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडचा जामीन अर्ज पूर्णपणे फेटाळला. यामुळे कराडला दिलासा मिळाला नाही आणि त्याचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे.
वाल्मीक कराडने यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीनासाठी अर्ज केला होता. त्याच्या वकिलांनी तपासात त्रुटी असल्याचा आणि मोक्का कलम चुकीचे लावल्याचा दावा केला होता. मात्र डिसेंबर 2025 मध्ये उच्च न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला. यानंतर कराडने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टात सरकारतर्फे धर्माधिकारी यांनी बाजू मांडली, तर वाल्मीक कराडतर्फे सिद्धार्थ दळे यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे सर्व मुद्दे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने कराडचा जामीन अर्ज थेट नाकारला. यामुळे प्रकरणातील मुख्य आरोपीला कोणताही दिलासा मिळाला नाही.
या निर्णयामुळे वाल्मीक कराडला तुरुंगातच राहावे लागणार असून संतोष देशमुख हत्या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पुढे जाणार आहे. संपूर्ण राज्यात या हत्येने मोठी खळबळ माजली होती. आता सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने पीडित कुटुंबीयांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
