Advertisement
मंगळवेढा : जल जीवन मिशन (जेजेएम) हा भारत सरकारच्या जल शक्ती मंत्रालयाने २०१९ मध्ये सुरू केलेला एक दूरदर्शी उपक्रम आहे. देशातील प्रत्येक ग्रामीण घराला नळ जोडणीद्वारे नियमित, सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी पुरवणे हे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. हे अभियान हर घर जल (प्रत्येक घराला पाणी) या तत्त्वावर आधारित आहे, ज्याचा उद्देश ग्रामीण भागातील पाण्याच्या उपलब्धतेत परिवर्तन करणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे आहे. जल जीवन मिशन अंतर्गत कामे पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतींना योजना हस्तांतरण करण्यात येणार आहे. परंतु, या योजनेचे भांडवल राजकारणाकरीता होत असल्याचे उघड आहे. मंगळवेढा येथे सध्या असाच प्रकार सुरू असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
सोलापूर जिल्ह्यातील तोरणी (ता.अक्कलकोट) आणि अरळी (ता. मंगळवेढा) येथे या योजनेंतर्गत करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले आहे. या दोन गावांत जलअर्पण दिवस साजरा करण्यात येत आहे. यामध्ये गावातील पाणीपुरवठा योजनेची संपूर्ण माहिती ग्रामस्थांना देऊन योजना कायमस्वरूपी ठेवण्यासाठी देखभाल दुरुस्तीची हमी घेण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या गावांना पाणी योजना मिळत असल्याचे स्वागत आहे. परंतु, याचे राजकीय श्रेय मात्र आमदार घेत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. मुळातच सोलापूर जिल्ह्यातील गावांसाठी ही योजना महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना २०१९ मध्ये मंजुर करण्यात आलेली आहे. तर, विधासभा निवडणुकीत पंढरपुरातून आमदार समाधान आवताडे हे २३ नोव्हेंबर २०२४ मध्ये ८४३० मतांनी दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. ही बाब लक्षात घेता सदर पाणीपुरवठा आमदारकीच्या काळात मंजुर कशा झाल्या? विशेष म्हणजे त्यांचे कार्यकर्ते पाणीदार आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण करीत ग्रामस्थांची दिशाभूल करीत आहेत. महाविकास आघाडीच्या काळात या गावांसाठी पूर्व मंजुर पाणीपुरवठा योजनांचे काम आता पूर्ण झाले आहे, सदर काम पूर्ण करण्यात जिल्हा प्रशासनाचा मोठा वाटा आहे, त्यामुळे अशा अधिकाऱ्यांचे काैतूक आहे. परंतु, आमदारांनी पूर्व मंजुर योजनांच्या कामाचे श्रेय घेत स्वत:ला पाणीदार आमदार म्हणून घेऊ नये, असे आवाहन विरोधकांकडून होत आहे.
