Advertisement
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने 23 जागा जिंकल्या. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 21 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर दावा केला होता. दोन्ही पक्षांकडून जागांची जुळवाजुळव सुरु होती. अशातच आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष बसला आहे. अध्यक्षपदी अविनाश गलांडे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र जैस्वाल यांची निवड झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही बहिष्कार टाकला. या निवडणुकीनंतर बोलताना मंत्री अतुल सावे यांनी म्हटले की, भाजप-शिवसेनेची युतीची बैठक झाली, त्या बैठकीला पालकमंत्री संजय शिरसाठ आणि त्यांचे आमदार उपस्थित होते. त्या बैठकीमध्ये आमची चर्चा झाली होती अडीच वर्ष भाजपाचा अध्यक्ष आणि शिवसेनेचा उपाध्यक्ष, त्याच पद्धतीने पुढच्या अडीच वर्षात शिवसेनेचा अध्यक्ष भाजपाचा उपाध्यक्ष असे ठरले होते. पण अचानक काय झालं मला माहिती नाही. तीन दिवसा अगोदर असं माहित झालं की, ते आमच्या पुरस्कृत उमेदवारांना फोन करून सांगत होते की, आपण वेगळं सरकार बनवणार आहोत, तुम्ही आमच्या सोबत याच पद्धतीने अपक्ष उमेदवारांना देखील त्यांनी फोन केले, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आमच्या सोबत असल्याचे जाहीर केले होते, तरी देखील शिवसेना त्यांना फोन करत होती. अतुल सावे पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही सकाळपर्यंत वाट पाहिली. ते आले नाही त्यांनी आम्हाला कॉल केला नाही संपर्कही केला नाही. त्यांना सकाळ पर्यंत आशा होती की आपले गणित जमलेले आहे. दोन आमदारांना त्यांच्या नातेवाईकांना अध्यक्ष करायचे होते, म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांना मिस गाईड केले, पण तो आकडा त्यांना जमवता आला नाही. आम्हाला बहुमताचा आकडा गाठता आला.
