#

Advertisement

Wednesday, April 8, 2026, April 08, 2026 WIB
Last Updated 2026-04-08T13:09:43Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मोहोळ तालुक्यातील विजय लमकणे सर्वसाधारण, मागासवर्गीय उमेदवारांमध्ये राज्यात प्रथम

Advertisement

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा 2024 चा अंतिम निकाल जाहीर 

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा 2024 चा अंतिम निकाल आज जाहीर झाला आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील विजय नागनाथ विजय लमकणे यांनी सर्वसाधारण आणि मागासवर्गीय उमेदवारांमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही यशस्वी कामगिरी केवळ वैयक्तिक नाही तर ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. परीक्षा 27 ते 29 मे 2025 रोजी झाली होती आणि आता 8 एप्रिल रोजी निकाल लागला. विजय यांना आता उपजिल्हाधिकारी पद मिळणार असून, त्यांचे नाव राज्यभरात चर्चेचा विषय बनले आहे. 

विजय लमकणे यांचे मूळ गाव कोण्हेरी, मोहोळ तालुका, सोलापूर जिल्ह्यातील आहे. ते जिल्हा परिषद शाळेत शिकले. चौथ्या इयत्तेत शिष्यवृत्ती परीक्षेत भाग घेतला आणि तेव्हापासून त्यांच्यात स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली. शहरातील सुविधांशिवाय, साध्या वातावरणात वाढलेल्या या तरुणाने शिक्षणात कधीही तडजोड केली नाही. ग्रामीण भागातील मर्यादित साधनसामग्री असतानाही त्यांनी ज्ञान मिळवण्यासाठी सातत्य राखले.वयाच्या दहाव्या वर्षापासून विजय यांचे एकच ध्येय होते – ‘कलेक्टर व्हायचे आणि लाल दिव्याची गाडी चालवायची.’ ते वारंवार म्हणत, “मला कलेक्टर व्हायचे आहे, मी लाल दिव्याच्या गाडीत बसणार.” हे स्वप्न त्यांनी मनात रुजवले आणि त्यानुसार प्रयत्न सुरू केले. विविध मान्यवरांचे व्याख्यान ऐकून त्यांचा मानसिक दृष्टिकोन तयार झाला. स्पर्धा परीक्षांमध्ये मनाची तयारी, आजूबाजूचे वातावरण आणि नियमित अभ्यास हे तीन घटक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

बहिणीशी झालेला वाद
विजय यांच्या बहिणीने सुरुवातीला त्यांना शिक्षक किंवा इंजिनियर होण्याचा सल्ला दिला होता. पण विजय ठाम होते – “कलेक्टरच व्हायचे.” यावरून दोघांत अनेकदा भांडणे झाली. बहिणीला वाटायचे की, सरकारी नोकरीची तयारी जोखमीची आहे, अनेक उमेदवार अपयशी ठरतात. मात्र विजय यांनी हार न मानता आपले ध्येय पुढे नेले. वडील नागनाथ लामकाने यांनी मात्र पूर्ण विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, “त्याला आयपीएसची परीक्षाही द्यायची आहे, त्यातही तो यशस्वी होईल.” कुटुंबातील हे मतभेद विजय यांच्या जिद्दीला अधिक बळकट करत गेले.

कशी केली तयारी?
एमपीएससीच्या पूर्वीच्या काही परीक्षांत विजय यांची निवड झाली होती आणि ते यशादा केंद्रात ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून प्रशिक्षण घेत आहेत. मुख्य परीक्षेसाठी त्यांनी सातत्याने अभ्यास केला. मनाची तयारी, योग्य वातावरण आणि नियमित अभ्यास यावर भर दिला. अपयश आले तरी हार न मानता पुढे जाण्याची तयारी ठेवली. अनेक उमेदवार एक-दोन प्रयत्नांतच निराश होतात, पण विजय यांनी जिद्द सोडली नाही. त्यांच्या या धोरणामुळेच आज ते राज्यात पहिले झाले आहेत.