#

Advertisement

Saturday, May 16, 2026, May 16, 2026 WIB
Last Updated 2026-05-16T11:50:10Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रा’चे नामकरण

Advertisement

पुणे, : अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे बळकटीकरण करताना शाश्वत विकासाची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून बळकटीकरण करावे. देशी गायीचा प्रचार व प्रसार होण्याच्यादृष्टीने पुशपालकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून देशी गायींचे मोठ्या प्रमाणात जतन व संवर्धन करण्याचे काम करावे, राज्यातील शेतकरी, पशुपालक आणि विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र प्रेरणादायी ठरणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, महात्मा फुले कृषी विद्यापीठ कुलगुरू डॉ. विलास खर्चे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक राहुल महिवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर आदी उपस्थित होते.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, पुणे येथील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, येथे कार्यरत असलेल्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे “अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र” असे नामकरण करण्यास राज्य शासनाने मान्यता देण्यात दिली होती ; त्यानुसार आज राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते नामकरण फलकाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी केद्रांच्या नुतन इमारतीच्या विकास कामाची पाहणी केली, यावेळी त्या बोलत होत्या.

पवार म्हणाल्या, देशी गायीचे शास्त्रीयदृष्ट्या संवर्धन, सुधारणा व संशोधन करणे आवश्यक असल्याने कृषी महाविद्यालय, पुणे येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे बळकटीकरणाचे काम दर्जेदार पद्धतीने व कालमर्यादेत पूर्ण करावे. कामे करतांना बदलत्या काळानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा , तसेच या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, देखभाल व दुरुस्तीच्या अनुषंगाने साहित्य उपलब्धतेचा विचार करण्यात यावा. केंद्रातील गाईंची संख्या विचारात घेता मलमुत्र व शेणाचे व्यवस्थापन करुन केंद्रामध्ये स्वच्छता ठेवावी. गाईंना पुरेसा प्रमाणात चारा, पाणी उपलब्ध राहील, याबाबत दक्षता घ्यावी. केद्रांमार्फत दुधाvपासून दुग्धजन्य उपपदार्थ निर्मितीवर भर देण्यात यावा, प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर देण्यात यावा, अशी सूचनाही श्रीमती पवार यांनी केली.
राज्य शासनाच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेले हे केंद्र ग्रामीण भागातील पशुपालकांसाठी मार्गदर्शक ठरत असून आधुनिक पशुपालन तंत्रज्ञानाचा प्रसार, उत्पादनक्षमता वाढ आणि शाश्वत शेती व्यवस्थेला चालना देण्याचे कार्य करणार आहे. या केंद्रामुळे विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून संशोधन आणि विस्तार कार्याला नवे बळ मिळणार असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. कार्यक्रमास प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, पशुपालक आणि शेतकरी उपस्थित होते.