Advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा ॲड. कोमल साळुंखे-ढोबळे यांची टीका
पुणे : भोर तालुक्यातील नसरापुरात तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तीची निर्घूण हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा करा म्हणून अखंड महाराष्ट्र रस्त्यावर उतरला आहे, पण तुम्ही कसली वाट बघत आहात? असा सवाल करीत कोणतीही घटना स्वतःच्या घरात किंवा स्वतः सोबत घडल्याशिवाय त्या घटनेचं गांभीर्य कळत नसेल तर म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ नसरापूर घटनेतील त्या आरोपीला दत्तक घ्यावे यातून तो किती क्रुर वृत्तीचा गुन्हेगार, खुनी आहे हे कळेलच आणि पक्के पुरावे पण मिळतील. मुख्यमंत्री साहेब.., एका लेकीचा बाप म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला आपणाकडून ही अपेक्षा नव्हती, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा ॲड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी केली.
नसरापूर येथील धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर ॲड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी पुणे पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांची भेट घेत निवेदन सादर केले, यावेळी त्यांनी नसरापूर प्रकरणातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
ॲड. कोमल साळुंखे-ढोबळे म्हणाल्या की, नसरापूर येथील अत्याचाराच्या घटनेनंतर लगेचच पर्वती पायथा येथेही अशीच घटना घडली, थेऊर येथेही अशाच घटनेची पोलीस नोंद झाली तर पाैड येथे एका मंतीमंद मुलीचा विनयभंग केला गेला, या घटना अवघ्या २४ तासांत घडल्या आहेत, यामुळे पोलिसांना निवेदन सादर केले आहे. आम्ही केवळ एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकार म्हणून नाही, तर पुण्यातील सामान्य महिला म्हणून स्वतःला असुरक्षित समजत आहोत. पुण्यात पूर्वी अशी परिस्थिती नव्हती, पण आता दररोज काहीतरी अघटित घडत आहे. मग ती मोठी महिला असो वा लहान मुलगी, कोणालाही सुरक्षित वाटत नाही. गुन्हेगारांमध्ये कायद्याचे भय उरलेले नाही. पूर्वी गुन्हे केलेले आरोपी राजरोसपणे बाहेर फिरत आहेत आणि पुन्हा नवे गुन्हे करायला मोकळे आहेत. हे कुठेतरी थांबायला हवे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून दवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी मोठी आहे.
पोलीस यंत्रणेच्या उपाययोजनांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असे वाटते. महिला सुरक्षेसाठी पोलिसांनी दामिनी पथक, सुरक्षा दीदी आणि ११२ हेल्पलाईन क्रमांक यासारख्या उपाययोजना पोलिसांनी केलेल्या असल्या तरी यावर आक्षेप घेताना ॲड. कोमल साळुंखे-ढोबळे म्हणाल्या की, मदत मिळेपर्यंत अनेकदा घटना घडून गेलेली असते. आम्हाला ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना हव्यात. रस्त्यावर फिरणारी सुरक्षा पथके वाढवली पाहिजेत आणि त्यात महिला पोलिसांची संख्या अधिक असायला हवी, गृहमंत्री फडणवीस यांनी यावर विचार करावा.
