Advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपप्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांची प्रतिक्रिया
पुणे : राजकारणात मतभेद असू शकतात, टीका-टिप्पणीही होऊ शकते. परंतु, ज्या व्यक्तीने तब्बल सहा दशकांहून अधिक काळ देश आणि महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण योगदान दिले, ते ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांची तुलना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपप्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी व्यक्त केली.
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या एका वक्तव्याबाबत ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे मत व्यक्त करताना म्हणाल्या की, ज्येष्ठ नेते शरद पवार हे केवळ एक राजकारणी नाहीत, तर देशाचे माजी संरक्षण मंत्री, केंद्रीय कृषी मंत्री आणि महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले नेतृत्व आहे. शेती, सहकार, उद्योग, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांमध्ये त्यांनी मोठे योगदान दिले आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी केलेले ऐतिहासिक कर्जमाफी, कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्याचे काम असो किंवा महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतलेले निर्णय असोत, त्यांची कारकीर्द अनेक महत्त्वाच्या कार्यांनी भरलेली आहे. विशेष म्हणजे, आज त्यांच्यावर टीका करणाऱ्या अनेक नेत्यांना राजकारणात संधी देण्याचे कामही शरद पवार साहेबांनी केले आहे. त्यामुळे मतभेद व्यक्त करताना किमान राजकीय संस्कृती आणि ज्येष्ठत्वाचा आदर राखला गेला पाहिजे, अशी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची भावना आहे. हा विषय कोणत्याही पक्षाचा नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा आहे. मतभेद असू शकतात, पण ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान राखणे ही आपली परंपरा आहे मग तो कोणत्याही पक्षाचा असो, ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान राखलाच पाहिजे, असे माझे ठाम मत असल्याचेही ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी स्पष्ट केले.
