Advertisement
भिवंडी : देशात जनगणना होत आहे, ज्यातून सर्व समाजाची खरी आकडेवारी समोर येईल. त्यामुळे कोणत्याही जातीवर अन्याय न करता, ज्याची जेवढी लोकसंख्या, तेवढे त्याला आरक्षण या तत्त्वाने आरक्षण मिळालं पाहिजे. मातंग समाजाच्या मनात आपल्यावर अन्याय झाल्याची भावना आहे, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
सोमवारी भिवंडी दौऱ्यावर असताना आठवले यांनी विविध मुद्यांवर आपली मंत मांडली. ते म्हणाले की, देशात जातीव्यवस्था कायद्याने संपली असली तरी लोकांच्या मनातून ती अद्याप गेलेली नाही. आजही खेड्यापाड्यात दलितांवर अन्याय होत आहेत. ज्या दिवशी मनातून ही जातीव्यवस्था पूर्णपणे नष्ट होईल, त्या दिवशी आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य शासनाकडून अनुसूचित जाती-जमातींच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यावर बोलताना आठवले म्हणाले, आता देशात जनगणना होत आहे, ज्यातून सर्व समाजाची खरी आकडेवारी समोर येईल. त्यामुळे कोणत्याही जातीवर अन्याय न करता, ज्याची जेवढी लोकसंख्या, तेवढे त्याला आरक्षण या तत्त्वाने आरक्षण मिळालं पाहिजे.
मराठा समाजाला आरक्षण देताना मूळ ओबीसींवर अन्याय होता कामा नये. त्यामुळे मराठा समाजाचा समावेश 10 टक्के ईडब्ल्यूएस (EWS) गटामध्ये करून त्या माध्यमातून आरक्षण देता येऊ शकते. आगामी जनगणनेनंतर सर्व समाजाची खरी आकडेवारी समोर येईल, परंतु तोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय लवकर व्हावा, अशी आमची भूमिका आहे, असेही रामदास आठवले म्हणाले.
पक्ष कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला
रिपब्लिकन पक्ष हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. दलित पँथरनंतर बाबासाहेबांचा हा पक्ष मी देशभर पसरवला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षाची शाखा केवळ एका विशिष्ट समाजापुरती मर्यादित ठेवू नये. केवळ एका समाजाच्या मतांवर कोणालाही सत्ता स्थापन करता येत नाही. पक्ष मोठा करायचा असेल तर सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन त्यांना न्याय देणे गरजेचे आहे, तरच पक्षाचा विस्तार होईल, असा सल्ला रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना दिला.
