Advertisement
दिल्ली दौऱ्याची व नाराजीची चर्चा, नेमकं काय घडलं
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बैठकीला प्रत्यक्ष गैरहजर राहिल्याने ते ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या अनुपस्थितीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, काल ते भीमाशंकर दौऱ्यावर असल्याने त्यांना परतण्यास उशीर झाला की त्यामागे काही राजकीय नाराजी आहे, यावरून तर्क-वितर्क लावले जात आहेत.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर निर्णय होण्याची शक्यता आहे. विशेषतः गेल्या काही दिवसांपासून 'मराठी भाषेच्या मुद्द्यावरून' दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये विसंवाद पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत या विषयावरून वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अशा वेळीच एकनाथ शिंदेंची गैरहजेरी समोर आल्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहिलेले एकनाथ शिंदे आज संध्याकाळी दिल्लीला रवाना होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यांच्या या अचानक ठरलेल्या दिल्ली दौऱ्यामागे नेमके काय कारण आहे, याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.
