Advertisement
जरांगे पाटील संतापले : केली सडकून टिका
जालना: अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 5 वा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षण आणि शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत माहिती दिली. तसेच, शिंदे समिती पुन्हा एकदा अंतरवालीत दौरा करणार असून चर्चा करण्यात येईल, असेही सांगितले. दरम्यान, यावेळी, राधाकृष्ण विखे पाटलांनी नाव न घेता थेट शरद पवार यांच्याकडे बोट दाखवलं. 1994 साली मंडल आयोगात हे टाकलं असतं तर आज ही वेळ आली नसती, हे सगळं त्यांचं पाप आहे, असेही विखे पाटलांनी म्हटले. त्यावर, आता जरांगे पाटलांनी उत्तर दिलं आहे.
शासनच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनीही आपली भूमिका मांडली. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून नाव न घेत शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील उल्लेख करण्यात आला होता. तसेच, 1994 सालच्या मुख्यमंत्र्यांचं हे पाप आहे,असेही विखे पाटलांनी म्हटले होते, त्यावरूनही जरांगे पाटलांनी सुनावलं. तुम्हाला तेच भांडण लावायचं आहे शरद पवार होते आणि कोणी होतं. त्यांनी वाटोळ केलं आमचं, तुम्ही काय कमी केलं का? असा सवाल जरांगे पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना विचारला. तसेच, आता तू शिफारस कर, तू मराठ्याचा देव, लोकाकडे कशाला बोट दाखवतो. आता, 12 तारखेपर्यंत वाट बघणार आहे, असे म्हणत विखे पाटलांवरही जोरदार हल्लाबोल केला.
आपल्या वाट्याला गेले तर मी सोडत नसतो, शिंदे असो फडणीस असो, दादा असो असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला. तसेच, विखे पाटील आणि सावंत डोक्यावर पडले आहेत का? गोळ्या सुरू आहेत का त्यांना? चांगला रिस्पॉन्स कसा असतो नरड्यात हात घालायचा का तुमच्या? आम्ही तुम्हाला येऊ नका म्हणलो का? असे म्हणत सरकारच्यावतीने जी बोलणी सुरू आहेत, त्यावरही जरांगे पाटलांनी भाष्य केलं. तुम्हाला यायचं असेल तर सगळे जीआर काढून या, असेही पाटलांनी म्हटले.
