Advertisement
लातूरचा तब्बल ११ तासांचा प्रवास आता फक्त ४ तासांत
पुणे: महाराष्ट्रात ठाणे-कल्याण परिसराला थेट मराठवाड्याशी जोडणाऱ्या कल्याण-लातूर जनकल्याण एक्सप्रेसवेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता दिली असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) या मार्गाची उभारणी केली जाणार आहे. या द्रुतगती मार्गामुळे कल्याण ते लातूर दरम्यानचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
सुमारे ४४२ किलोमीटर लांबीचा हा सहापदरी आणि पूर्णपणे प्रवेश नियंत्रित ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग असणार आहे. ठाणे, कल्याण, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना या मार्गामुळे जोडणी मिळणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ३५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या कल्याण ते लातूर प्रवासासाठी १० ते ११ तासांचा कालावधी लागतो. नव्या द्रुतगती मार्गामुळे हा प्रवास सुमारे चार तासांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पातील महत्त्वाचा भाग म्हणजे माळशेज घाटाला बायपास करण्यासाठी प्रस्तावित असलेला सुमारे आठ किलोमीटर लांबीचा बोगदा. माळशेज घाटातील वळणावळणाचा आणि काही ठिकाणी अवघड असलेला रस्ता टाळून वाहनांना बोगद्यातून पुढे जाता येणार आहे. त्यामुळे घाटातील वाहतूक कोंडी आणि प्रवासातील अडचणी कमी होण्यास मदत होऊ शकते.
हा ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग विद्यमान कल्याण-अहमदनगर-नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ला समांतर असणार आहे. कल्याण, मुरबाड, माळशेज घाट, ओतूर, आळेफाटा, अहिल्यानगर, पाथर्डी, बीड, मांजरसुंबा आणि अंबाजोगाईमार्गे हा मार्ग लातूरला जोडला जाणार आहे.
भविष्यात लातूरजवळ या द्रुतगती मार्गाची नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाशी जोडणी करण्याचा विचार आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि गोवा या भागांमधील जलद वाहतूक आणि दळणवळणाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, प्रकल्पाची अंमलबजावणी, अंतिम वेळापत्रक आणि प्रत्यक्ष प्रवासाचा कालावधी याबाबत पुढील अधिकृत तपशील महत्त्वाचा ठरणार आहे.
