Advertisement
डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला, आंदोलनाबाबत संभ्रम
पाटोदा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांच्या पुढील प्रवासाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. उपोषणामुळे त्यांची तब्येत खालावली असून त्यांना सध्या पाटोद्यातच विश्रांती घ्यावी लागत आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता ते पाटोद्यातून श्रीगोंद्याच्या दिशेने रवाना होणार होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना उठणे आणि प्रवास करणेही कठीण झाले आहे.
डॉक्टरांनी पाटोद्यात त्यांची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीत रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याचे सांगण्यात आले. शरीरातील पाण्याचे प्रमाणही घटले असून डिहायड्रेशन वाढल्यास गंभीर परिणाम होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. त्यांना सलाईन देण्यात आले असून पुढील उपचारांचा निर्णय युरिन रिपोर्टनंतर घेतला जाणार आहे. डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, जरांगे पाटील उपचार घेण्यास तयार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करण्यासाठी जरांगे पाटील यांनी केलेल्या अर्जांना मुंबई पोलिसांकडून आतापर्यंत दोनदा परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यांनी पुन्हा अर्ज केला असून गरज पडल्यास उच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. जरांगे पाटील यांच्याकडून उच्च न्यायालयात तातडीने याचिका दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी का नाकारली, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सरकारी वकिलांना माहिती दिली जात असल्याचे समोर आले आहे.
